महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ डिसेंबर।। केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीविरोधातील वातावरण पेटण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वात नाशिकच्या चांदवडमध्ये मोर्चा निघणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार दिल्लीला रवाना होणार असून कांद्याच्या संदर्भाने एका बैठकीला ते उपस्थित राहणार आहे.
केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय
कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासह देशातील उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी असणार आहे. या निर्णयामुळे संघटना आक्रमक झाल्या आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.