Manohar Joshi : बाळासाहेब ठाकरेंचा एक आदेश आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्रिपद सोडलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ फेब्रुवारी ।। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं गुरुवारी पहाटे हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. गुरुवारी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनेत ते गेल्या काही वर्षांपासून फारसे सक्रिय नव्हते. पण त्यांनी पक्षाचा सुवर्णकाळ पाहिला आहे. इतकंच नाही तर महाष्ट्राचं मुख्यमंत्रिपदही त्यांनी भुषवलं आहे. मात्र हे मुख्यमंत्रिपद त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या एका शब्दावर सोडून दिलं. त्यामागचा किस्सा काय आहे तुम्हाला माहीत आहे का?

मनोहर जोशींनी मुख्यमंत्रिपद का सोडलं?
१९९५ मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार पहिल्यांदा आलं. शिवसेना आणि भाजपा यांनी ती निवडणूक जिंकली. मुख्यमंत्री होते मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे. शिवाजी पार्कवर अत्यंत दिमाखदार सोहळ्यात मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची कारकीर्द बहरत होती. मात्र १९९९ मध्ये मनोहर जोशींचे जावई गिरीश व्यास यांच्यावर पुण्यातल्या एका शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप झाला. हा आरोपच मनोहर जोशींच्या गच्छंतीचं कारण ठरला.

काय घडलं आरोप झाल्यावर?
जावयावर आरोप झाल्यानंतर मनोहर जोशींचं मुख्यमंत्रिपद जाणार या चर्चा सुरु झाल्या होत्या. बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र मनोहर जोशींना पाठवलं. एका पत्रावर मनोहर जोशींनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या असा मजकूर पत्रात होता. ती आज्ञा शिरसावंद्य मानत मनोहर जोशींनी राजीनामा दिला आणि मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला गेले होते.

मनोहर जोशी काय म्हणाले होते?
बाळासाहेब ठाकरेंच्या एका पत्रावर मनोहर जोशींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत कुठलाही राग नव्हता. यानंतरच्या काळात जेव्हा त्यांना याविषयी विचारणा झाली तेव्हा ते म्हणाले होते, “जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री केलं होतं तेव्हा का केलं असं विचारलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला तेव्हा मी तातडीने राजीनामा दिला.” असं मनोहर जोशींनी सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *