महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ मे । निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट आणि हंगामाच्या सुरवातीला वाढलेली मागणी यामुळे फळांचा राजा असलेल्या (Hapus Mango) हापूस (Mango Market) आंब्याचा बाजापेठेत एक वेगळाच तोरा होता. शिवाय उत्पादन घटल्यामुळे यंदा सर्वसामान्यांना चव चाखायला मिळणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, व्यापाऱ्यांनी वर्तवलेला अंदाज अखेर खरा उतरला आहे. एप्रिलनंतर तिसऱ्या मोहराचे उत्पादन वाढेल असा अंदाज अक्षयतृतेया दरम्यानच वर्तवण्यात आला होता. त्यानुसार उत्पादनात वाढ झाली असून मागणी ही घटली आहे. (Mango Rate) त्यामुळे 1 डझन आंब्यासाठी ग्राहकांना 1 हजाराहून अधिक रुपये मोजावे लागत होते. पण आता आवक वाढल्याने डझनभर आंब्यासाठी 150 ते 400 रुपयेच मोजावे लागत आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळतेय हे महत्वाचे. शिवाय दर कमी झाल्याने कोकणातील आंबा उत्पादकांनी माल मार्केटमध्ये पाठवण्याऐवजी जागेवरच कंपन्यांना विकण्यास प्राधान्य दिले आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई मार्केटमध्ये हापूसची आवक सुरु झाली होती. त्यानुसार दिवसाकाठी 90 हजार पेट्यांची आवक सुरु होती. मात्र, पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी अवस्था झाल्याने दर घटले आहेत. काही दिवसांपूर्वी हापूसची एक पेटी ही 3 हजार 500 रुपयांपर्यंत विकली जात होती. आता आवक वाढल्याने हीच पेटी 1 हजार ते 2 हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट ज्यूस बनवणाऱ्या कंपन्यांना जागेवर आंबा विक्रील प्राधान्य दिले आहे.
देवगड हापूस आंब्याचा हंगाम लवकर सुरु झाला होता. शिवाय उत्पादनातही घट झाली होती त्यामुळे 20 मे पर्यंत हंगाम संपेल असा अंदाज आहे तर दुसरीकडे रत्नागिरी हापूसचा हंगाम हा 30 मे पर्यंत अटोक्यात येईल असा अंदाज आहे. 20 मे नंतर मात्र, गुजरात येथील हापूस, केशर आणि राजापूरी आंब्याचा हंगाम सुरु होणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जुन्नर हापूस मार्केटमध्ये येणार आहे.
निर्यातीमधून आंबा उत्पादकांना अधिकचा फायदा होता पण दुबईतील दर एवढे घसरले आहेत की येथील दरापेक्षा वाहतूकीलाच अधिक खर्च येत आहे. दुबई येथील मार्केट 1 डझन आंबा 540 रुपयांना मिळतो तर तोच आंबा निर्यातीसाठी 660 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी तोटा सहन करु शकत नाहीत. त्यामुळे कोकणातून होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.