महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ फेब्रुवारी ।। जमीन ताबेमारी, अवैध धंदे यामध्ये जर पोलिसांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आढळून आला तर त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. मला पारदर्शी, परिणामकारक पोलिसिंग अपेक्षित आहे. तडीपार आरोपी शहरात आढळून आला किंवा त्याने गुन्हा केला तर त्याचे उत्तर संबंधित पोलिस ठाण्यांच्या तपास पथकाला द्यावे लागेल. गुन्हेगारी कधी संपत नाही, मात्र रेकॉर्डवरील गुन्हेगाराने गुन्हा करता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि.५) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील जमीनीला आलेले सोन्याचे भाव, त्यातून सुरू असलेली बेकायदेशीर ताबेमारी. यामध्ये जर पोलिसांनी त्यांचे कायदेशीर काम सोडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गैर मार्गाने काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पोलिसांनी निर्धारीत नियमांच्या चौकटीतच राहून काम करावे असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला आहे. पारदर्शि कारभारावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे माझ्या कालावधीत चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही.
अवैध धंदे शंभर टक्के बंद झाले तर गुन्हेगारी आपोआप आटोक्यात येईल. रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गुन्हा घडता कामा नये. त्यासाठी यापुढे केवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून चालणार नाही. तो मिळून आला आहे हे ऐकून घेतले जाणार नाही. त्या गुन्हेगाराच्या वर्तनाचे मुल्यमापन पोलिसांना करावे लागणार आहे. त्याच्याकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाईचे फॉर्म भरून पोलिस घेतील. तसेच तो
या कालावधीत काय करतो? त्याच्याकडील गाडी चोरीची आहे का? तो शस्त्र बाळगतो का? याबाबतची माहिती अद्यावत ठेवून झाडाझडती घ्यावी लागणार आहे. जे चांगले जीवन जगतात त्यांना त्रास नको असे देखील आयुक्त म्हणाले. तडीपार गुन्हेगार शहरात आढळून आला तर त्याच्यावर कारवाई होईलच, मात्र त्याच बरोबर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला देखील त्याचे परिणाम भोगावे लागतील. सराईत गुन्हेगाराने वारंवार गुन्हे केले किंवा गोळीबार केला तर त्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यावर असेल. त्यामुळे मला संख्यात्मक नको असून, गुणात्मक पोलिसिंग हवे आहे. असा इशारा देखील अमितेश कुमार यांनी दिला आहे. ज्यांची कायद्याशी दुश्मनी त्यांची आमच्याशी पोलिस कोणाचेही शतु नाहीत. आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या कामासाठी बांधील आहोत. मात्र ज्यांनी कायद्याशी दुश्मनी केली त्यांची आमच्याशी दुश्मनी असेल असे देखील आयुक्तांनी सांगितले.
… म्हणून पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित केले
पोलिस उपनिरीक्षक निलंबित प्रकरणावर बोलताना अमितेश कुमार म्हणाले, कर्तव्याच्या ठिकाणी पोलिस असतील तर त्यांनी यापुढे केवळ बघ्याची भूमिका घेता कामा नये. त्यांनी तेथे प्रतिसाद देणे गरजेचे आहे. विद्यापीठात तोडफोड झाली. तेथे निलंबित करण्यात आलेले पोलिस उपनिरीक्षक हजर होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी याबाबत भूमिका घेत वेळेत नियंत्रण कक्षाला माहिती दिली नाही. तसेच वरिष्ठांना देखील कळविले नाही. त्यांनी केलेला हा प्रकार गंभीर आहे. म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यात कमी मनुष्यबळ नको
पोलिस ठाणे हे कोअर जॉब आहे. तेथे कमी मनुष्यबळ असून चालणार नाही. ठाण्यात काम करण्यासाठी अधिकारी कर्मचारी हवे आहेत. लवकरच ७७ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहकतूक येथील आढवा घेऊन या बदल्या करण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी पाच वषपिक्षा अधिक कालावधीपासून कर्मचारी काम करत आहेत, त्यांच्या देखील बदल्या करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
ज्यांची कायद्याशी दुश्मनी त्यांची आमच्याशी दुश्मनी
पोलिस कोणाचेही शत्रू नाहीत. आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या कामासाठी बांधील आहोत. मात्र ज्यांनी कायद्याशी दुश्मनी केली त्यांची आमच्याशी दुश्मनी असेल असे देखील अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. एका दिवसात सर्व काही ठिक होण्यासाठी आमच्याकडे जादूची कांडी नाही. काम करत असताना काही निर्णय चुकतीलही मात्र चांगल्या कामातून बदल होतील हे मात्र नक्की असल्याचे त्यांनी सांगितले.