महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च ।। मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दिल्ली-राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही राज्यांमधील तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच उकाड्यापासून काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत अनेक राज्यांत पावसाचा इशारा दिला आहे.
स्कायमेट हवामान अहवालानुसार, येत्या २४ तासांत पश्चिम हिमालयात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यादरम्यान, हिमवर्षाव देखील होऊ शकतो. तर पंजाब, हरियाणा, केरळ, सिक्कीम आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण भागात हलका पाऊस पडू शकतो. गेल्या गुरुवारी (ता. २७) गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली.
त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, आसाम आणि मणिपूरमध्ये हलका पाऊस झाला. हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, तामिळनाडू आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीवर भागातही पावसाने हजेरी लावली होती.
त्यानंतर शुक्रवारी (ता. २८) या भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते. आता वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तरेकडील पर्वतांवर पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे तापमानाचा पार चाळीशीपार जाऊ शकतो. कोकण आणि मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.