महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च ।। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळय़ाप्रकरणी मोदी सरकारने ईडीच्या आडून शिखंडी डाव टाकून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबले. गेल्या दोन वर्षांत ईडीने आपच्या नेत्यांच्या घरांसह विविध ठिकाणी तब्बल 250 धाडी टाकल्या. परंतु एक रुपयाही मिळाला नाही. हा पैसा नेमका कुठे गेला, त्याचे काय झाले? याचा गौप्यस्फोट आज स्वतः अरविंद केजरीवाल न्यायालयासमोर करणार आहेत, जनतेला सत्य सांगणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश लोकांना वाचून दाखवला. याबाबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
सुनीता केजरीवाल म्हणाल्या, मी तुरुंगात अरविंदजींना भेटायला गेले होते. त्यांना डायबेटीस आहे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित नाही. परंतु मोदी सरकारच्या हुकूमशाही आणि दडपशाहीविरोधात लढण्याचा त्यांचा निश्चय दृढ आहे. केजरीवाल यांनी गेल्या दोन दिवसांत तुरुंगातूनच मंत्री अतिशी यांना दिल्लीकरांच्या पाणी आणि सांडपाण्याच्या समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले. यावरही केंद्र सरकारने खटला भरला. दिल्लीकरांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम केजरीवाल तुरुंगातूनही करत आहेत, यात त्यांनी काय चूक केली, या लोकांना दिल्ली उद्ध्वस्त करायची आहे का? दिल्लीतील लोकांच्या समस्या सुटू नयेत असे या लोकांना वाटते का? असे सवाल सुनीता केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केले.