महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । मच्छीमारांसाठी अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. पावसाळी मासेमारी बंदी झाल्यानंतर आता पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. असे असले तरी मात्र अद्याप 50 ते 60 टक्के नौकाच मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. एकीकडे नौका मालकांची आर्थिक स्थिती ढासळलेली असल्याने अनेकांना आगाऊ रकमा देऊन खलाशी आणणे शक्य झालेले नाही तर दुसरीकडे मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी नौका देखभाल दुरुस्ती करावी लागते, मात्र पर्ससीन नौका दुरुस्ती करणाऱ्या कामगारांची कमतरता भासत असल्याचे मच्छिमारांकडून सांगितले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर मच्छीमार बांधवांच्या नौका दुरुस्तीसाठी कारागीर मिळत नसल्यामुळे मच्छीमारांसमोर मोठी समस्या निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतरही निम्म्याच नौका समुद्रात जात आहेत.