महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ सप्टेंबर । Jalna News – जालना जिल्ह्यातील अंतरावील सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मागीला काही दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला दहा दिवस उलटून गेले असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. यावर राज्य सरकारने जीआर काढला. मात्र त्यात वंशावळ शब्द टाकल्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं आहे. त्यातच आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले की, तुम्हीच आत्महत्या केल्या तर आरक्षणाचा फायदा कोण घेणार? मराठा आरक्षणासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. कोणीही उग्र आंदोलन करू नका. कारण विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होता कामा नये. विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल झाल्याने शिक्षणाला अडचण येईल, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान आम्ही आंदोलन करत असताना तुम्ही उग्र आंदोलन करण्याचा अट्टहास करू नका. मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं.
विदर्भातून मराठा समाजाला कुणबीमध्ये सामील कऱण्यास विरोध असल्याच्या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, ते आमच्या जिजाऊंच्या भुमीतील लोक आहे. लहान-मोठ्या भावाचा प्रश्न नाही. त्यांचा गैरसमज झाला असेल पण, ते आमच्या बाजुने उभे राहतील. जिजाऊ माँसाहेबांच्या वीरभूमीने राज्याला न्यायाचं स्वराज्य दिलं आहे. आम्हाला न्याय मिळत असताना ते आम्हाला कधीच विरोध करू शकत नाही, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.