कोरड्या थंड वाऱ्यांनी पुन्हा राज्य गारठणार? पहा हवामान अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। राज्यात पावसाळी वातावरण निवळले असून पुन्हा एकदा गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि बहुतांश भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. आता उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह पुन्हा एकदा सक्रीय झाले असून राज्यात दाट धुक्यासह गारठा वाढताना दिसतोय. पावसाचे वातावरण गेल्याने सध्या राज्याच्या किमान व कमाल तापमानात बदल होत आहेत. येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.(IMD Forecast)

राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली.त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिकांना तडाखा बसला. सध्या राज्यातील किमान व कमाल तापमानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, राजस्थान आणि परिसरात चक्राकार वारे वाहत असून उत्तर गुजरात व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार असल्याने अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण होते.पूर्वेकडील वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील थंडी कमी झाल्याचे चित्र आहे.

तापमानात काय बदल होणार?
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमानात येत्या 24 तासांत 4-5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. (Dry Weather) येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात घटणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे.

किमान तापमान वाढले
राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली असून याआधी 4-5 अंशांवर असणारा किमान तापमानाचा पारा 19-20 अंशांपर्यंत गेल्याच्या नोंदी झाल्या. मुंबईत तापमान20 अंशांच्याही पुढे गेले होते. तर सांगली, सातारा तसेच बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 17-19 अंशांवर जाऊन ठेपला होता.

नव्या वर्षाची सुरुवात कशी होणार?
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीनं होणार असून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ताज्या हवामान अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *