महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या हत्याकांडाचा मुख्यसुत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. वाल्मिक कराडला अटक करावी या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चेही काढण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून आता खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वाल्मिक कराडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ”व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका?” असं प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
याशिवाय संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या फोटोवर”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल? हाय का नाही मोठा जोक?”. असा मजकूरही लिहिण्यात आलेला आहे.
व्वा! क्या सीन है??
नक्की कोण कुणाचा आका?
@Dev_Fadnavis
@anjali_damania
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde pic.twitter.com/a4jw2kWT6V— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2024
नेमकं प्रकरण काय?
९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर सर्वत्र त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मुद्दा लावून धरला आहे. देशमुख हत्यांकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप करत त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचा आश्रय आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडला तत्काळ अटक करावी तसेच धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेनंतर विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत आहे