महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । ‘आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही. मात्र तशी कोणतीही कारवाई झाली तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू आणि त्यांच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन करू’, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्या कार्यकाळातील एकही दिवस कमी होणार नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढवली जाईल, असा खुलासा करतानाच मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्राचा विकास पूर्ण ताकदीने करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत’, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. ‘मी पुन्हा येईन’, या व्हिडीओसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मला आश्चर्य वाटते की जर एखाद्याला यायचे असेल तर तो असा व्हिडिओ टाकून येतो का?’.
शरद पवार यांनी केलेल्या विधानालाही बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ‘शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात हाच फरक आहे’, असे सांगत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत’, असे फडणवीस म्हणाले. तसेच ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०४ खासदार निवडून येतात आणि आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली चारच खासदार निवडून येतात त्यांचा पंतप्रधानांनी धसका घेतला असे म्हणणे हास्यास्पद आहे, असा टोलाही एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस यांनी पवार यांना लगावला.