‘अन्न न खाता माणूस… .’; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर ।। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं. आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या शरीरावर या आमरण उपोषणाचा नेमका काय परिणाम होत आहे यासंदर्भातील एका डॉक्टरांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अर्थात ही पोस्ट मनोज जरांगे-पाटील समर्थकांची चिंता वाढवणारी असली तरी एवढ्या दिवस अन्नशिवाय राहिल्याने शरीरामध्ये नेमके काय बदल होतात हे या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

अन्न न खाता माणूस…
मुळचे लातूरचे असणारे आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले डॉ. प्रकाश कोयाडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता वाटत असल्याचं सांगत पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. प्रकाश कोयाडे यांनी आपल्या पोस्टमध्ये उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांचा आंदोनलस्थळावरील फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये डॉ. प्रकाश कोयाडे म्हणतात, “अन्न न खाता माणूस फक्त पाण्यावर साधारणपणे तीन ते चार आठवडे जगू शकतो तर अन्न आणि पाणी दोन्ही शिवाय साधारणपणे एक आठवडा माणूस जगू शकतो.” पुढे लिहिताना डॉ. प्रकाश कोयाडे यांनी, “अगदी शंभर टक्के प्रत्येकवेळी हे असंच घडतं असं नाही तर त्या व्यक्तीचं शरीर, भौतिक परिस्थिती, मानसिक स्थिती बऱ्याच गोष्टींचा थोडाफार फरक पडतो,” असंही नमूद केलं आहे.

…की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात
सोमवारी मनोज जरांगे-पाटील यांनी संवाद साधण्यासाठी माईक हाती घेतला तेव्हा त्यांचा हात थरथरत होता. या गोष्टीकडे लक्ष वेधत डॉ. प्रकाश कोयाडे यांनी हे लक्षण बरं नाही असं म्हटलं आहे. “जरांगे पाटलांचा आज (30 ऑक्टोबर) उपोषणाचा सहावा दिवस आहे. माईक हाती धरताना त्यांचे हात थरथरत होते. हे लक्षण काही ठीक नाही,” असं डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे. “व्यक्तीचं वजन बऱ्यापैकी असेल तर अन्न न मिळाल्यामुळे आधी शरीरातील फॅट वापरलं जातं आणि शरीराला तग धरायला वेळ मिळतो. एकदा का फॅट संपलं की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात कारण शरीराकडे उर्जा मिळविण्याचा तो एकच पर्याय असतो. अशावेळी प्रतिकूल लक्षणं दिसायला लागतात जशी की, अशक्तपणा, चक्कर येणं, त्यातीलच एक म्हणजे हे हातांची थरथर,” असं या पोस्टमध्ये पुढे डॉ. प्रकाश कोयाडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *