महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर ।। न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालाच्या आधारावर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण राज्यातील मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे. अर्धवट जीआर काढण्यात आला, तर तो आम्हास मान्य नाही. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करू, असे सांगून मनोज पाटील जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव फेटाळला. जाळपोळ ताबडतोब थांबली पाहिजे; अन्यथा आपणास वेगळाच निर्णय घ्यावा लागेल, असे जरांगे पाटील म्हणाले.
आंतरवाली सराटीत उपोषण मंडपात ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी आग्रह केल्यानंतर जरांगे यांनी थोडे पाणी पिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार बच्चू कडू यांनी एक पत्र पाठवून जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचे आवाहन केले आहे, हे सांगत त्यांचा आपण आदर करतो, असे ते म्हणाले. दरम्यान, आंदोलनात होत असलेल्या हिंसक घटनांत सत्ताधारी नेत्यांचे लोक असल्याचा संशय जरांगे यांनी व्यक्त केला.