महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.३ मार्च ।। मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत असलेली कोंडी टाळण्यासाठी येथील मार्गात पुन्हा नव्याने बदल करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. ३) होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली. त्यानंतर सोमवारपासून (ता. ४) गणेशखिंड रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्याचा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिला आहे.
या ठिकाणी ठराविक काळासाठी रस्ते बंद
विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणारा रस्ता पोलिस पेट्रोल पंपापर्यंत ‘बफर रोड’ करण्यात येणार आहे. सकाळी सात ते दुपारी १२ दरम्यान बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. दुपारी १२ ते सकाळी सातपर्यंत विद्यापीठ चौकातून बाणेरकडे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी सात ते दुपारी १२ दरम्यान विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्तामार्गे अभिमानश्री सोसायटी चौकातून इच्छितस्थळी जावे.
असे आहेत बदल
– विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्तामार्गे सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजवीकडे वळण्यास मनाई आहे.
– सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेसमोरून वळावे. तेथून सेनापती बापट रस्त्याकडे जावे.
– शिवाजीनगरहून गणेशखिंड रस्तामार्गे येणाऱ्या वाहनांना उजवीकडे रेंजहिल्स कॉर्नरकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.
– वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेकडून वळून (यू टर्न) रेंजहिल्सकडे जावे.
अवजड वाहनांना २४ तास बंदी
गणेशखिंड रस्त्यावरील चापेकर चौक ते विद्यापीठ चौक दरम्यान २४ तास अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. औंध रस्ता (ब्रेमेन चौक ते विद्यापीठ चौक), बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गावर अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. भाजीपाला वाहतूक करणारी वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, तसेच डंपर, मिक्सर, जेसीबी, रोड रोलर अशा वाहनांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री दहापर्यंत बंदी राहणार आहे.