![]()
आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि आमदार हेमंत रासणे यांची संयुक्त पाहणी; मिरवणूक मार्गांवरील त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर २०२६ ।। गणरायाच्या आगमनाला आता फारसा अवधी उरलेला नाही आणि पुणे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की रस्त्यांवरील खड्डे दिसू लागतात, ड्रेनेजची झाकणे आठवतात आणि अतिक्रमणांचा प्रश्न अचानक महत्त्वाचा ठरतो. यंदाही चित्र फार वेगळे नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि आमदार हेमंत रासणे यांनी प्रमुख मिरवणूक मार्गांची संयुक्त पाहणी केली. रस्ते, खड्डे, अपूर्ण खोदाई, ड्रेनेज, पदपथ, वीज व्यवस्था, अतिक्रमणे आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींचा प्रत्यक्ष आढावा घेऊन संबंधित विभागांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
कसबा गणपतीपासून सुरू झालेल्या या पाहणीत शिवाजी रोड, केळकर रोड, भाऊ रंगारी परिसर, मंडई, दगडूशेठ गणपती, गुरुजी तालीम, लक्ष्मी रोड आणि पुरम चौक यांसह मध्यवर्ती पुण्यातील महत्त्वाच्या मार्गांची तपासणी करण्यात आली. काँक्रीट आणि डांबरी रस्त्यांवरील खड्डे, खोदाईनंतर पूर्ववत न केलेले रस्ते आणि पादचाऱ्यांच्या मार्गातील अडथळे प्रशासनाच्या नजरेत आले. ड्रेनेज लाईनमधील गळती, अडथळे तसेच उघड्या विद्युत तारा आणि पदपथांवरील डीपी बॉक्स यांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना गणेशोत्सवापूर्वी या समस्या दूर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिक्रमणाचा प्रश्नही यावेळी केंद्रस्थानी आहे. गणेशोत्सवात हजारो भाविक रस्त्यावर उतरतात; पण अरुंद रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि मंडपांमुळे पादचाऱ्यांना चालायलाही जागा उरत नाही. परिणामी भक्तीच्या गर्दीचे रूप वाहतूक कोंडीत बदलते. प्रशासनाने मार्ग मोकळे करण्याचे आदेश दिले असले, तरी आदेश आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील अंतर पुणेकरांना नवीन नाही. खड्डे बुजविणे, ड्रेनेज दुरुस्त करणे आणि अतिक्रमणे हटविणे ही कामे उत्सवापूर्वी पूर्ण होतात की पुन्हा फक्त पाहणीचे फोटो उरतात, याचीच आता खरी उत्सुकता आहे.
गणेशोत्सव हा पुण्याची ओळख आहे; त्यामुळे प्रशासनासाठी ही केवळ धार्मिक उत्सवाची तयारी नाही, तर शहर व्यवस्थापनाचीही परीक्षा आहे. रस्ते खड्डेमुक्त, पदपथ मोकळे आणि ड्रेनेज सुरळीत ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची, तर गर्दी व वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पोलिसांची आहे. नवीन रस्ते खोदाईला ब्रेक देण्यासह प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. आता गणरायाच्या स्वागतापूर्वी प्रशासनाचे आदेश प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतात की नाही, हेच पाहावे लागेल. पुणेकरांची अपेक्षा साधी आहे—गणरायाच्या मिरवणुकीत भक्ती असावी, खड्ड्यांची अडथळ्यांची शर्यत नको!
