महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ जानेवारी – भारताने चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाचे गाबामध्ये अपराजित होण्याचे रेकॉर्ड तोडले. ब्रिस्बेनमध्ये तब्बल तीन दशकानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे. तर भारताने गाबामध्ये पहिली कसोटी जिंकून इतिहास रचला आहे.
१९८८ मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये ३१ कसोटी सामने खेळले आणि त्यातील २४ जिंकले आणि ७ सामने अनिर्णित राहिले.
अजिंक्य रहाणेच्या ‘टीम’ इंडियाने सांघिक कामगिरीचा वस्तूपाठच घालून देत ऑस्ट्रेलिया विरुद्धची ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली. चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचे ३२८ धावांचे आव्हान पाचव्या दिवशी ७ गड्यांच्या मोबदल्यात पार करत मालिका २ – १ अशी खिशात घातली. भारताकडून ऋषभ पंतने ८९ धावांची झुंजार खेळी केली. पंतबरोबरच सलामीवीर शुभमन गिलने ९१ धावांची दमदार खेळी करत या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. चेतेश्वर पुजारानेही चिवट फलंदाजी करत ५६ धावांची दीर्घ खेळी केली. त्याने गिल, रहाणे पंतबरोबर महत्वपूर्ण भागिदारी रचली.
विशेष म्हणजे १९४७-४८ च्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनचा गाबावरचा भारताचा हा पहिलाच विजय आणि ऑस्ट्रेलियाचा १९८८ नंतरचा हा गाबावरील पहिलाच पराभव आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने गाबावर आतापर्यंत ६ कसोटी खेळल्या आहेत. २००३ मधील ड्रॉ केलेल्या कसोटीचा अपवाद वगळता भारताचा या मैदानावरचा हा पहिला विजय आहे. त्यामुळे अजिंक्यचे नेतृत्व आणि नव्या दमाच्या टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचा हा विजय आहे.
भारताने गाठलेली तिसरी सर्वोच्च चेस
वेस्ट इंडिज विरुद्ध १९७५-७६ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत ४०६ धावा पार
इंग्लंड विरुद्ध २००८-०९ मध्ये चेन्नईत ३८७ धावा धावसंख्या पार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०२०-२१ मध्ये ३२८ धावसंख्या पार