महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या आठ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तर आजपासून मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण अधिक कडक करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
सरकारने दिलेल्या शब्दानुसार मनोज जरांगे पाटील यांनी पाणी ग्रहण करण्यास सुरूवात केली होती. मात्र अध्यादेश घेऊन आले नाही तर संध्याकाळी 5 नंतर मनोज जरांगे पाटील पाण्याचा त्याग करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची समजूत आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून वेळोवेळी केले जात असताना ते मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाच्या मागणीवर ठाम आहेत.