महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ सप्टेंबर । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली नसून, काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्यासह ११ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनी केलेला दावा हा चुकीचा असल्याचा आक्षेप शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे घेण्यात आला आहे.
बंडानंतर अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. पक्षाच्या बैठकीत आपली अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा करीत घडय़ाळ हे चिन्ह मिळावे म्हणून अर्ज केला होता. या पत्राच्या आधारे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजाविली होती व त्यात अजित पवार यांच्या दाव्यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. यानुसार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाला सविस्तर पत्र सादर करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली. काही निवडक आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात फूट पडली असे होत नाही, असा दावा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार हे पक्षावर दावा करू शकत नाहीत. कारण बंडानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह १२ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईवर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पक्षाची घटना, त्यात अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया, अध्यक्षांच्या निवडीसाठी लागणारा कालावधी या मुद्दय़ांचा पत्रात परामर्श घेण्यात आला आहे. अजित पवार यांनी कधी आणि कोणत्या अधिकारात बैठक बोलाविली, असा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या नोटिशीनुसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. पक्षात फूट पडलेली नाही आणि अजित पवार यांना पक्षावर दावा करता येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.- आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते