महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । थलैवा रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर त्यांना चाहते आदर्श देखील मानतात. आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सुपरस्टार रजनीकांतने शानदार एन्ट्री केली. यावेळी उपस्थित हजारो चाहत्यांनी जल्लोष करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यादरम्यान सुपरस्टारने अनेक विषयांवर मत मांडलं. त्याचवेळी त्याने त्यांच्या आयुष्यातील दारूच्या व्यसनाबद्दलही खुलासा केला.
रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या व्यसनाविषयी मोकळेपणानं भाष्य केलं. याविषयी बोलताना ‘दारू नसती तर समाजाची सेवा केली असती’ असं ते म्हणाले आहेत. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘दारूचे व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मी असे म्हणत नाही की ते पूर्णपणे टाळा. मजा आली की दारू प्या. नियमित मद्यपान करू नका. हे आरोग्य आणि आनंद खराब करेल.’ असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे.
मात्र, रजनीकांत यांनी या वाईट व्यसनाबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीमध्ये, चारुकेसी या तामिळ नाटकाच्या ५०व्या दिवसाच्या समारंभासाठी त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, तेव्हा अभिनेत्याने व्यसनाधीनतेबद्दल भाष्य करत त्या काळात त्यांना मदत केल्याबद्दल त्यांच्या पत्नीचे आभार मानले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, ‘मी माझी पत्नी लताची ओळख करून देत आहे. जेव्हा मी कंडक्टर होतो तेव्हा मी रोज दारू प्यायचो आणि मी रोज किती सिगारेट ओढले याचा हिशेब नाही. मी दिवसाची सुरुवात मांसाहाराने करायचो आणि दिवसातून दोनदा तरी मांसाहार करायचो. मला शाकाहारी लोकांचा तिरस्कार वाटायचा, पण हे तिघे एक घातक कॉम्बिनेशन आहेत.’ रजनीकांत म्हणाले की, माझ्या मते जे लोक या तिघांचे दीर्घकाळ सेवन करतात, ते ६० नंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.