महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी ठाणे शहरातील गडकरी सभागृहात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक महत्वांच्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि बांगड्या फेकल्या.
त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून ठाण्यातील राजकीय वातावरण रात्रभर तापलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 46 मनसैनिकांवर (MNS News) गुन्हे दाखल केले आहेत. अजूनही मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जातेय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या राड्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे-ठाकरे गट राड्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया
ठाणे शहरातील मनसे आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “खरं तर या राड्याची सुरुवात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्यात झाली होती. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. त्याच ॲक्शनची ही रिएक्शन आज पाहायला मिळाली. मी अशा घटनांचं समर्थन करत नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात?”
ठाण्यातील राड्यानंतर ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते आक्रमक झाले असून मनसेवर घणाघाती टीका करीत आहेत. ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केलाय. मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात? असा संताप राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.