महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलने सुरू आहेत. या घटनेची दखल स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फटकारलं होतं. लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहता का, अशा शब्दात सरकारला फटकारलं. याचदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अत्याचार घडलेल्या शाळेत घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी चौकशी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मेंटेनन्सचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्याची मुदत महिन्याभरापूर्वीच संपली होती. त्यामुळे जबाबदारी आता शाळा प्रशासनावरच आली आहे. सीसीटीव्हीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर त्याला किंवा इतर ठेकेदाराला ते काम देण्यात आले नव्हते. महिन्याभरापासून सीसीटीव्हीच्या मेंटेनन्सचे काम बंद राहिल्यामुळे काही कॅमेरे बंद पडले होते.
बंद पडलेले कॅमेरे वेळेत दुरुस्त करण्यासाठी ठेकेदारच नसल्यामुळे शाळेतील सीसीटीव्हीची व्यवस्था कोलमडली होती. शाळा प्रशासनाने ठेकेदाराची मुदत संपण्याआधीच निविदा काढणे अपेक्षित होते किंवा नवीन ठेकेदाराची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र, ते काम न केल्यामुळेच गोंधळ झाला आणि आरोपीच्या विरोधात पुरावे मिळणे अवघड झाले.