महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून हे येत्या दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे. कारण त्यांनी विधानसभेबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळणार आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत. यात पाटील आणि पवार यांच्यात भेट झाल्याने यात भर पडली. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी ते अजूनही महायुतीतच असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीच्या नेत्यांशी बोलून दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे पाटील म्हणाले.
2014 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढले, तेव्हा राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांनी काँग्रेसच्या पाटलांचा पराभव केला. पुढे 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटली, त्यामुळे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली तरही त्यांच्या पदरी निराशा आली. आता अजित पवार यांची राष्ट्रावादी महायुतीत आल्याने ही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडे राहण्याची चिन्हे आहेत. अशात भाजपकडून संधी न मिळाल्यास पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचा पावित्रा घेतला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यावेळी इंदापूर विधानसभेची उमेदावारी मिळेल या आश्वसनावर त्यांनी महायुतीचा प्रचार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.