महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। राज्यातील ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर रोजी चार हजार रुपये जमा होणार आहेत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट-नोव्हेंबरचे हप्ते जमा होणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वाशिम येथील समारंभात राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार रुपये जमा होणार आहेत. पाच ऑक्टोबर रोजी वाशिम येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते योजनाचे हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ दिला. जून 2023 पासून आयोजित गाव पातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देश पातळीवर दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आजरोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.