महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) येऊ शकतात, मात्र त्याआधीच एक्झिट पोलच्या आकडेवारीनं काही राजकीय पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. 10 पैकी सात एक्झिट पोलच्या निकालात महायुतीचं सरकार पुनरागमन करताना दिसत आहे. दरम्यान, ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणातून पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रातील जनता कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती देणार हे समोर आलं आहे.
ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, यावेळीही 31 टक्के लोकांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे.
या सर्वेक्षणात 12 टक्के लोकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपली पसंती असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली पाहिजे, असं त्यांचं मत आहे.
याशिवाय अवघ्या दोन टक्के लोकांनी अजित पवार यांनाच मुख्यमंत्री म्हणून आपला पर्याय जाहीर केला आहे. तसेच, दोन टक्के लोकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचं नाव आघाडीवर आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, 18 टक्के लोकांना त्यांना महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री बनवायचं आहे.
त्यांच्याशिवाय केवळ 5 टक्के लोकांनी शरद पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. तसेच, जयंत पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ एक टक्का लोकांनी पसंती दिली.
त्याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना केवळ दोन टक्के लोकांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे.
.
याशिवाय केवळ दोन टक्के लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. तर यापैकी एकही नेता मुख्यमंत्री होऊ नये, असं मानणारे 6 टक्के लोक आहेत.
