महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. यासह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. मुंबई पुणे अशा शहरांमध्ये नागरिक उन्हामुळे त्रस्त झालेत. अशात आज शनिवारी पुण्यासह अन्य १२ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘यलो अलर्ट’
हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. हवामान खात्याने पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, धुळे, जळगाव, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
शनिवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील धुळे, पुणे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली येथे पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर मराठवाड्यातील विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, नांदेड येथे वादळी वारे, विजांसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक तापमान
राज्यात आज सर्वाधिक तापमान अकोल्यात ४४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालीये. त्यामुळे कर्नाटक, दक्षिण तमिळनाडू येथे वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने म्हटलंय.