महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जानेवारी ।। यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. प्रत्येक क्षेत्राला भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय, महिला, व्यवसायिक यांना काय मिळणार, याकडे देशाचे लक्ष लागलेय. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात. रेल्वेच्या बजेटमध्ये २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. १० वंदे भारत स्लीपर, १०० अमृत भारत एक्सप्रेसची घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
भारतीय रेल्वे सध्या आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. नव नव्या ट्रेन्सची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासोबतच रेल्वे बोगी अपग्रेड करण्यात येत आहे. सोयी-सुविधा युक्त मॉर्डन स्टेशनही तयार करण्यात येत आहेत. वंदे भारतनंतर आता वंदे भारत स्लीपर आणि अमृत एक्स्प्रेस यासारख्या नव्या ट्रेन वाढण्याची शक्यता आहे. मेट्रो जाळं, बुलेट ट्रेन, हायड्रोजन ट्रेन याबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यासर्व गोष्टी पाहाता रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वेचे बजेट किती वाढणार ?
गत वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेच्य बजेटमध्ये 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थतज्ञांच्या मते, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रेल्वेचा निधी 3 लाख कोटी ते 3.50 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असेल. सध्याच्या चालू आर्थिक वर्षासाठी (2024-25) रेल्वेचा निधी 2.65 लाख कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी 80 टक्के रक्कम रेल्वेने खर्च केली आहे. उर्वरित २० टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षांमध्ये वापरली जाईल.
सर्वसामान्यांसाठी काय काय मिळणार ?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण रेल्वेसाठी अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. रेल्वेच्या माजी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात 10 वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि 100 अमृत भारत एक्स्प्रेस चालवल्या जाऊ शकतात. त्याशिवाय 1700 इलेक्ट्रिक इंजिन आणि 8500 डबे जोडून रोलिंग स्टॉक वाढवला जाईल. यामध्ये 4000 नॉन-एसी कोच, वंदे भारतचे 800 डबे, MEMU/EMU/वंदे मेट्रो श्रेणीचे 1000 डबे असतील.
बजेटमध्ये आणखी काय काय ?
नवीन ट्रॅक तयार करणे आणि जुन्या ट्रॅकला अपग्रेड करण्याबाबत बजेटमध्ये घोषणा होऊ शकते.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर (एमएएचएसआर) अधिक वेगात पूर्ण करण्यासाठी सरकारकडून बुलेट ट्रेनच्या बजेटमध्ये वाढ करण्यात येईल.
अपघात रोखण्यासाठी जास्तीत जास्त ट्रेनमध्ये कवच सिस्टम लावण्यात येईल, त्यासाठी बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे.
रेल्वे ड्रोन तंत्रज्ञानाचा देखील विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणाही होऊ शकते.
रेल्वेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (AI) प्रोत्साहन देण्यासाठी घोषणा होऊ शकते.