महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून नद्या आणि नाल्यांमध्ये पाणी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठी असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने या भागातील शेकडो कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून धरण प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सुमारे १५,५७० क्युसेक्स पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. यामुळे पवना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून नदीकाठच्या वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. वाल्हेकर वाडी, चिंचवडगाव, भाट नगर, संजय गांधी नगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आणि पवनानगर या भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास 600 हून अधिक कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) पथक तैनात करण्यात आले असून नागरिकांना आवश्यक ती मदत केली जात आहे. स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांसाठी अन्नपाणी, वैद्यकीय सेवा आणि आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी घरामध्ये पाणी शिरल्याने आपला संसारसामान गमावला असून त्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
इंद्रायणी नदीचा जलस्तरही धोक्याच्या पातळीच्या वर गेला असून चिंचवड, आकुर्डी व निगडी परिसरातील नागरिक सतर्कतेवर आहेत. मुळा नदीकाठील रहिवाशांनाही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. पाणी साचल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विशेषतः मुंबई-पुणे महामार्गालगतच्या काही भागांमध्ये वाहतूक कासवगतीने सुरू आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहराच ग्राम दैवत असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात पवना नदीचं पाणी शिरलं आहे. मंदिराचा जवळपास ५० % इतका भाग पाण्याखाली गेला आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोरया मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे.
महापौर, महापालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफची पथकेही पिंपरी-चिंचवड परिसरात सतर्क ठेवण्यात आली आहेत. पुढील २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नदीकाठील नागरिकांना तात्काळ सावधगिरी बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे.
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, अनेक कारखान्यांतील कामगारांनी सुरक्षिततेसाठी कामावर जाणे टाळले आहे. पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रंदिवस कार्यरत आहे.