महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | आशिया कपचा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. ग्रुप स्टेज आणि सुपर ४ नंतर आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आलेत. या परिस्थितीमुळे आशिया कपचा इतिहास बदलणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी कधीही न पाहिलेलं एक दृश्य पाहायला मिळेल.
आशिया कपचा इतिहास बदलला
सुपर ४ मध्ये दमदार कामगिरी करून भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता पाकिस्ताननेही बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केलाय. आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचलाय.
ही स्पर्धा १९८४ मध्ये सुरू झाली होती, परंतु दोन्ही संघ कधीही अंतिम फेरीत आमनेसामने आलेले नाहीत. पण यावेळी मात्र हे होणार आहे. आशिया कपचा हा १७ वा हंगाम आहे. मागील १६ हंगामात असा अंतिम सामना कधीही पाहिला नव्हता. दोन्ही संघांमधील हा ऐतिहासिक सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
कोण मारेल बाजी?
दरम्यान टीम इंडिया नववे विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३ मध्ये विजेतेपद जिंकले आहे. तर पाकिस्तानने दोनदा विजेतेपद जिंकलंय. २००० आणि २०१२ मध्ये पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.
२०२५ आशिया कपचा आतापर्यंतचा प्रवास
या स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. भारताने ग्रुप स्टेजमध्ये यूएई, पाकिस्तान आणि ओमानचा पराभव करून सुपर फोरमध्ये प्रवेश केला. तर पाकिस्तानला गट फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला. पण युएई आणि ओमानला हरवून पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचला. त्यानंतर टीम इंडियाने सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्ताननेही श्रीलंका आणि बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.