महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर | भारत -पाकिस्तान क्रिकेट सामन्यांतून मिळणारा पैसा दहशतवादासाठीच वापरला जाणार, ही भीती अखेर खरी ठरली. आशिया कपच्या फायनल सामन्याचे संपूर्ण मानधन दहशतवादी मसूद अझहरला देण्याचे पाकिस्तानी टीमने जाहीर केले आहे. मसूदबरोबरच अन्य दहशतवाद्यांवरही पैशाची खैरात करण्यात आली आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवली होती. त्यात भारतीय संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहरच्या कुटुंबीयांसह काही दहशतवादी मारले गेले होते. त्या मसूदला पाकिस्तानी संघ आर्थिक ताकद देणार आहे. पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
मसूदचे 10 कुटुंबीय झाले होते ठार
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या 10 नातलगांचा मृत्यू झाला होता. त्यात त्याची बहीण, भावोजी, पुतण्या, त्याची पत्नी, पुतणी व पाच मुलांचा समावेश होता. पाकिस्तानी क्रिकेट संघाने जाहीर केलेली आर्थिक मदत या सगळ्यांचा नातलग म्हणून मसूद अजहर याला मिळेल असे बोलले जात आहे.
पीसीबीचेही ट्विट
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही एक ट्विट केले आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाने आशिया कपमधील फायनल सामन्याचे संपूर्ण मानधन 7 मेच्या हल्ल्यातील शहिदांना देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सहवेदना शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे पीसीबीने म्हटले आहे.