![]()
महागाईच्या धुरात दिलासा; पेट्रोलपेक्षा स्वस्त E85 ची एंट्री, पण गाडीही तशीच हवी!
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जून २०२६ ।। पेट्रोल पंपावर गाडी थांबवताना आजकाल वाहनधारकांचा चेहरा पाहिला तर तो जणू लग्नातल्या बँडवाल्यापेक्षा अधिक गंभीर दिसतो. कारण गाडीपेक्षा मीटर वेगाने धावत असते आणि पेट्रोल भरल्यानंतर पाकीट मात्र उपवासाला लागते. अशा काळात केंद्र सरकारने ‘पेट्रोलपेक्षा २० रुपये स्वस्त इंधन’ बाजारात आणल्याची घोषणा होताच अनेकांच्या डोळ्यांत आशेचा दिवा पेटला. काहींनी तर लगेच हिशेब मांडायला सुरुवात केली, “आता महिन्याला किती वाचणार?” पण सरकारी योजनांमध्ये जसा तळटीपेत खरा मजकूर असतो, तसाच या दिलास्यालाही एक छोटासा तारा आहे. इंधन स्वस्त आहे, पण ते वापरणारी गाडीही तशीच असावी लागणार आहे!
दिल्लीत देशातील पहिले E85 इंधन स्टेशन सुरू झाले आणि इथेनॉलच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. या इंधनात ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल आहे. म्हणजे पेट्रोलचा खर्च कमी आणि शेतकऱ्यांच्या पिकांना नवा बाजार जास्त. आजवर गाड्या परदेशी तेलावर धावत होत्या, आता ऊस, मका आणि शेतीमालाच्या बळावर धावण्याची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे तेल आयातीवरचा खर्च कमी होईल, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मूल्य मिळेल, असा सरकारचा दावा आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर आता केवळ इंधन नाही, तर शेती आणि अर्थव्यवस्थेच्या नव्या समीकरणांचाही पुरवठा होणार आहे.
या नव्या इंधनाची किंमत दिल्लीत ८२.१२ रुपये प्रति लिटर ठेवण्यात आली आहे. सध्याच्या E20 पेट्रोलपेक्षा जवळपास २० रुपये स्वस्त असल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र इथेच कथा थोडी वळण घेते. E85 हे इंधन कोणत्याही सामान्य पेट्रोल वाहनात भरून चालणार नाही. त्यासाठी विशेष ‘फ्लेक्स-फ्युएल’ वाहनांची आवश्यकता आहे. म्हणजे स्वस्त इंधनाचे स्वप्न दाखवताना सरकारने आधी योग्य वाहन असण्याची अटही ठेवली आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक सध्या ‘इंधन बदलावे की गाडी?’ या द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री Hardeep Singh Puri यांनी दिल्ली-एनसीआर, पुणे, मुंबई आणि नागपूरसह देशभरात मोठ्या प्रमाणावर इथेनॉल स्टेशन उभारण्याचा रोडमॅप जाहीर केला आहे. २०२६ अखेरपर्यंत ५०० हून अधिक E85 स्टेशन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे इंधन क्षेत्रात मोठा बदल घडण्याची चिन्हे आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी नागरिकांच्या खिशाला दिलेला दाह कमी करण्यासाठी हा प्रयोग किती यशस्वी ठरतो, हे येणारा काळच सांगेल. मात्र एवढं नक्की—पेट्रोलच्या प्रत्येक वाढत्या दरानंतर ज्या नागरिकांना धक्का बसायचा, त्यांना आता किमान आशेचा एक नवा ‘ऑक्टेन’ मिळाला आहे!
