महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ नोव्हेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना अत्यंत गंभीरतेने घेतल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सांगितले. तसेच, महिलांच्या सन्मानाशी खेळणा-यांचे आता ‘राम नाम सत्य’ होईल, असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
जौनपूर आणि देवरिया येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अलाहाबाद न्यायालयानं निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतर वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर ‘राम नाम सत्य’ची यात्रा आता निघणार आहे.
यावेळी योगींनी सांगितले की, आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. ऑपरेशन शक्तीचा हाच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत. त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणार आहोत. न्यायालयाचे आदेशाचे देखील पालन होणार व महिलांचा सन्मान देखील होणार आहे.