महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ नोव्हेंबर – राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयं आजपासून सुरु झाली आहेत. नववी आणि बारावीच्या वर्गांना आजपासून सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये शाळा सुरु होणार नाहीत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि अमरावतीमधील शाळा आजपासून सुरु होत आहेत. दरम्यान शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अनेक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक संघटनांकडून शाळा सुरु करु नये अशी मागणी करण्यात येत आहे. तरी शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु
राज्य सरकारने शाळा उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आजपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शाळांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेज या शाळेतही जय्यत तयारी करण्यात आली आहे.. शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स मेन्टेन करण्यासाठी बेंचवर विद्यार्थ्यांचे नाव टाकण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी एका दिवशी मुले तर एका दिवशी मुली येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षकांचीही covid-19 ची चाचणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्व शिक्षक हे निगेटिव्ह आहेत. एकंदरीत या विद्यालयात लॉकडाऊननंतरची शाळा उघडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.