महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर – भारतीय संघाने सलामीच्या डे-नाइट कसोटीवर पकड मिळवली. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूवरील कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भारतीय संघाने सर्वबाद २४४ धावा काढल्या. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. आठ डे-नाइट कसोट्यांमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात आघाडी घेऊ शकला नाही. ही दिवस-रात्र कसोटीतील ऑस्ट्रेलियाची एका डावातील सर्वात कमी धावसंख्या ठरली. भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉ (४) आल्या पावली परतला. दिवस अखेर मयंक अग्रवाल (५) आणि नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह (०) खेळत आहेत. भारताला ६२ धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघाने शुक्रवारी ६ बाद २३३ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, अवघ्या ११ धावांमध्ये संघाने ४ फलंदाज गमावले.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. त्यांच्या २९ धावा असताना दोन फलंदाज तंबूत परतले. बुमराहने मॅथ्यू वेड व जो बर्न्सला पायचीत केले. अश्विनने ठराविक अंतरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना झटका दिला. त्याने चौथ्यांदा स्टीव स्मिथला (१) बाद केले.
4 बळी अश्विनने घेतले. त्याची ही आॅस्ट्रेलियाविरुद्धची सर्वाेत्तम कामगिरी ठरली. पहिल्यांदा डे-नाइट कसाेटीत भारताच्या फिरकीपटूने चार विकेट घेतल्या. गत डे-नाइट कसाेटीत सर्वच १९ बळी हे भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी घेतल्या हाेत्या. ऑस्ट्रेलियाला पहिली धाव काढण्यासाठी २८ चेंडू खेळावे लागले. हादेखील एक विक्रम बनला. अश्विनने ४, उमेश यादवने ४ व बुमराहने २ बळी घेतले.