महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – देवदेवतांच्या नावाचा सर्रास वापर करून सर्वसामान्यांच्या गळ्यात यंत्र तंत्र मारणाऱया व्यावसायिकांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. लोकांच्या श्रद्धेचे बाजारीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रात यापुढे टीव्ही चॅनल्सवर देवदेवतांच्या, यंत्रतंत्राच्या जाहिराती दाखवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.विविध चॅनल्सवर पुन्हा अशा जाहिराती झळकू नयेत यासाठी मुंबईत विशेष कक्ष (सेल)स्थापन करून अघोरी कृत्य आणि काळी जादू कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना खंडपीठाने दिल्या आहेत.
काही विशेष चॅनल्सवर धर्माच्या नावाखाली हनुमान चालिसा, देवीचे यंत्र यासारख्या वस्तूंच्या जाहिराती दाखवल्या जातात. यामुळे महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट होत आहे.राज्य शासनाच्या 2013 मधील अघोरी कृत्य आणि काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर अशा जाहिरातींवरील प्रक्षेपणावर बंदी असतानाही या जाहिराती दाखवण्यात येत असल्याने संभाजीनगर येथील सिडको भागात राहणारे राजेंद्र अंभोरे या शिक्षकाने 2015 साली हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
