महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ जानेवारी – 60 हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणने घेतला निर्णय सरकारने मोठे पाऊल उचलत सामान्य नागरिकाला मोठा झटका दिला आहे. रिपोर्टनुसार 60 हजार कोटी रुपयांचे वीजबिल थकबाकीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरण कंपनीने 71 लाख 68 हजार 596 ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची नोटीस पाठवली आहे. नोटिशीनुसार, तुम्ही शनिवारपर्यंत वीजबिल भरले नसेल तर सोमवारपासून तुमची वीजजोडणी कापण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.
महावितरणने आपले नुकसान भरून काढण्यासाठी ग्राहकांना 15 डिसेंबरपासून थेट किंवा एसएमएसद्वारे नोटीस पाठविणे सुरू केले होते. जर 15 दिवसांच्या आत वीज बिल भरले नाही तर कनेक्शन तोडले जाईल असे नोटीसीत स्पष्टपणे सांगितले होते. पुणे विभागाच्या ग्राहकांना सर्वाधिक नोटीस पाठविल्या आहेत. येथील 24 लाख 14 हजार 868 लोकांना एसएमएसद्वारे नोटीस पाठवण्यात आली. तर औरंगाबाद विभागातील ग्राहकांना सर्वात कमी नोटीसी पाठवण्यात आल्या. येथे 9 लाख 97 हजार 397 नोटीस पाठवण्यात आल्या. विदर्भातील 16 लाख 79 हजार 984 ग्राहकांना नोटिसा पाठविल्या आहेत.