![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मार्च २०२६ ।। आकाशात ढग दिसले की लोकांना वाटतं—आज तरी उन्हाचा तडाखा कमी असावा. पण निसर्गालाही कधी कधी विनोद करायची हौस असते. ढग वरती फिरत असतात आणि खाली मात्र अंगाची होरपळ सुरू असते. सध्या महाराष्ट्रात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार गुजरातपासून लगतच्या परिसरात आणि कर्नाटकाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या प्रणालीचे परिणाम मराठवाड्यापर्यंत जाणवत असून कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तास काही भागांत आकाश अंशतः ढगाळ राहणार असले, तरी उष्णतेचा पारा खाली येण्याची चिन्हे मात्र फारशी दिसत नाहीत.
उलट ढगाळ वातावरणामुळे उकाडा आणखी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः विदर्भात तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागांमध्ये दमट हवामानामुळे उष्म्याची तीव्रता अधिक जाणवेल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास हवामान कोरडे राहणार असून दुपारच्या वेळेत उन्हाचा जोर वाढेल. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बाहेर पडावेच लागले तर टोपी, पाणी आणि हलके कपडे यांचा आधार घ्यावा, असा सल्लाही नागरिकांना देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाचा पारा हळूहळू वर चढताना दिसेल. पुणे, सातारा, सांगली या भागांत आकाश अंशतः ढगाळ राहील; मात्र तापमानात घट होण्याची शक्यता कमी आहे. विदर्भात वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे हवेतला गारवा जवळपास नाहीसा होईल आणि तापमान ३७ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, परभणी आणि धाराशिव येथे हवामान कोरडे व उष्ण राहणार असल्याने उन्हाच्या झळा कायम राहतील. दरम्यान, खासगी हवामान संस्था Skymet Weatherच्या अंदाजानुसार अंदमान-निकोबार बेटसमूहात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तेलंगणा, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि केरळमध्ये हलक्या सरी पडू शकतात. उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये हलका पाऊस आणि उंच भागात तुरळक हिमवृष्टीची शक्यता आहे. मात्र मध्य भारतात उकाड्याचे दिवस सुरू होण्याची चाहूल स्पष्टपणे दिसू लागली आहे. 🌤️🌡️
