महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – अहमदाबाद – अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱया दिवसअखेरीस भारत फ्रंटफूटवर उभा आहे. यष्टिरक्षक रिषभ पंत व अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सातव्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारताचा पहिला डाव सावरला आणि पहिल्या डावात मोलाची आघाडी मिळवून दिली. रिषभ पंतने 101 धावांची खेळी साकारताना इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. हे त्याचे तिसरे कसोटी शतक ठरले. वॉशिंग्टन सुंदरने 60 धावांची खेळी साकारली असून आता त्याच्यासोबत अक्षर पटेल (11 धावा) खेळपट्टीवर खेळत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 205 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने शुक्रवारी 7 बाद 294 धावा केल्या असून आता टीम इंडियाकडे 89 धावांची आघाडी आहे.