महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – मुंबई – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस आणखी वाढत असून रविवारी सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात लसीकरणाने वेग घेतला असला तरीही रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता औरंगाबाद शहरातही ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून रविवारी जाहीर करण्यात आले. राज्यात शुक्रवारी १० हजार २१६, शनिवारी १० हजार १८७ तर रविवारी ११ हजार १४१ कोरोनाबाधित आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
आैरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान २५ दिवस अंशत: लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता या कालावधीत विवाह साेहळे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी राहिल. ज्यांची लग्ने या काळात आहेत त्यांना फक्त रजिस्टर मॅरेज करण्याची मुभा असेल. जाधववाडीचा भाजीबाजारसह सर्व आठवडे बाजार सात दिवस बंद राहतील. शनिवार- रविवार हे दाेन दिवस दिवसभर बाजारपेठ पूर्णत: बंद राहील. वेरुळ- अजिंठ्यासह सर्व पर्यटनस्थळे सुरू राहतील. जिल्हाबंदी नसल्याने एसटीची सेवा सुरू राहील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.