महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल । पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच फॉर्ममध्ये आहे. बाबरचा आत्मविश्वास खेळपट्टीवर वावरताना स्पष्ट दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० सामन्यातही त्याने वादळी खेळी करत शतक ठोकलं. तर वनडेत चांगली कामगिरी केल्याने विराट कोहलीला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. या गौरवानंतर बाबर आझमने आता नवं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आता कसोटी सामन्यात नंबर एकवर पोहोचण्याचा त्याचा मानस आहे.
“झहीर अबाबस, जावेद मियांदाद आणि मोहम्मद यूसुफ यांच्या श्रेणीत जाण्याचा मानस आहे. माझ्या कारकिर्दीत हा मैलाचा दगड ठरणार आहे. आता मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. अधिक वेळ अव्वल राहण्याचा प्रयत्न आहे. जसं विवियन रिचर्ड्स १९८४ ते १९८८ या कालावधीत अव्वल होते. तर विराट कोहलीही १२५८ दिवस पहिल्या स्थानावर होता.”, असं बाबर आझमने सांगितलं.