महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । भारतीय हवामान खात्याकडून शुक्रवारी, लक्षद्वीप भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचं पुढील 24 तासांत चक्रीवादळात रुपांतर होणार असून, हे वादळ गुजरातच्या दिशेनं सरकणार असल्याचा इशारा दिला.लक्षद्वीप भागात दक्षिणेकडील 30 किमी दक्षिणपश्चिम अमिनी दिवी भागात चक्रीवादळसदृश परिस्थिती तयार होत असून, पुढच्या 24 तासांत हे वारे अधिक तीव्र होणार असून उत्तर दिशेनं उत्तरपश्चिम भागाकडे सरकणार आहेत. गुजरातला 18 मे रोजी हे वादळ धडकेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
सदर परिस्थिती पाहता हवामान खात्याकडून महाराष्ट्र, केरळ, गुजरात या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. शनिवारी सकाळपासूनच या भागांत वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार असून, वादळाची तीव्रता दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आणखी वाढण्याचं चित्र आहे. चक्रीवादळाच्या हा धोका पाहता मासेमार कोळी बांधवांना खोल समुद्रात न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तोक्ते (Tauktae) असं नाव असणाऱ्या या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप बेटसमूह, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक (किनारपट्टी आणि त्यालगतचा भाग), दक्षिण कोकण आणि गोवा, गुजरात या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.