महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । यंदाच्या वर्षीही आषाढीवरीवर (Ashadi Vari) कोरोनाच (Coronavirus) सावट आहे त्यामुळे मागीलवर्षी प्रमाणे सर्व प्रमुख सोहळ्याच्या पादुका थेट बसमधून नेण्यासाठीचा प्रस्ताव शासनांकडून देण्यात आला होता. मात्र सर्व सोहळा प्रमुखांनी त्याला नकार देत पायी वारी करण्याची आग्रही भूमिका मांडली होती. त्यानुसार सर्व मागण्यांचा विचार करून शासनाने गठीत केलेली समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्या अहवालावर निर्णय येण्याआधीच वारकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आषाढीवारी पायीच नेणार अस म्हटलं आहे. वारकऱ्यांचे नेते हभप बंडात्यात्या कराडकर (Bandyatatya Karadkar) यांनी या बाबत ची माहिती दिली आहे.
शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असंही कराडकर म्हणाले.
अर्थातच कराडकर यांनी मांडलेली ही भूमिका केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठीची असल्याने इतर सोहळ्यातील पालखी प्रमुख बंडात्यात्या करडकरांच्या मागणीला पाठींबा देतात का यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे सर्व पालखी सोहळे वेगवेळ्या वाटेने जाणार असल्याने प्रशासनावर ताण येणार असेल तर सर्व पालख्या एकाच मार्गावरून नेल्या जाव्यात असा ऐतिहासिक आणि धाडसी प्रस्ताव सोहळ्यातील मुख्य मानकरी राजा भाऊ चोपदारांनी मांडून शासना समोर आणखी एक पर्याय ठेवला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.