महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । यंदाचा आयसीसी टी-20 विश्वचषक यूएई आणि ओमनमध्ये खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत हिंदुस्थानचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. याच पाश्वभूमीवर बोलताना टीम इंडियाचा माजी सलामीवीर खेळाडू गौतम गंभीर याने पाकिस्तानविरुद्ध अंतिम 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान द्यावे हे सांगितले आहे.
‘स्टार स्पोर्ट’च्या एका शोमध्ये बोलताना गौतम गंभीर याने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघही निवडला आहे. के.एल. राहुल आणि रोहित शर्मा यांचा समामीवीर खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या स्थानावर कर्णधार विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे, तर चौथ्या स्थानासाठी फॉर्मात असणारा खेळाडू सूर्यकुमार यादवची निवड गंभीरने केली आहे.
मधली फळी
मधली फळी मजबूत करण्यासाठी गंभीरने पाचव्या स्थानावर विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला निवडले आहे. गंभीरच्या संघात दोन अष्टपैलूंचा समावेश असून हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजावर त्याने आपला डाव खेळला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून डेथ ओव्हर स्पेशलिस्ट भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जयप्रीत बुमराहची निवड करण्यात आली, तर फिरकीपटू म्हणून गंभीरने मिस्ट्री बॉलर वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिले आहे.
अश्विनला स्थान नाही
गंभीरने आपल्या संघात दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनला स्थान दिले नाही. विशेष म्हणजे टी-20 संघात अश्विनची तब्बल 4 वर्षानंतर निवड करण्यात आली आहे. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीला वगळून त्याला संघात स्थान दिल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले होते.
सातव्यांदा भिडणार
दरम्यान, हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्डकपमध्ये सहाव्यांना भिडणार आहे. प्रत्येक वेळेस हिंदुस्थानच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. याही वेळस हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानचा पराभव करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
गंभीरचा अंतिम 11 खेळाडूंचा संघ
के.एल. राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.