महाराष्ट्र 24 – पुणे ।
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने 1 एप्रिल ते 30 जून 2020 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली. ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सर्व जिल्हा जात पडताळणी समित्यांना विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेच्या कालावधीत जवळपास सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील.
ज्या प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कळवून त्रुटींची पूर्तता करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 31 मेपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पूर्तता करावी. त्यासाठी आवश्यक पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन कणसे यांनी केले आहे.