महाराष्ट्र २४ – मुंबई – शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार असून ही योजना रोज एक लाख थाळ्या देण्यापर्यंत वाढवण्यात येणार असून सध्या जिल्हास्तरापुरती असलेली ही योजना तालुकास्तरापर्यंत नेण्याचा विचार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली. छगन भुजबळ यांनी सांगितले, अनेक सदस्यांनी शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली आहे. सध्या ही योजना प्रायोगिक स्तरावर असून ती टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी अशी मागणी अर्थमंत्र्यांना केली आहे.
ग्रामविकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना सुरु रहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
उज्ज्वला योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी सांगितले, उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांकडे सिलिंडर आहे मात्र ते सिलिंडर पुन्हा भरण्याची त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसल्याने सिलिंडर विनावापर पडून आहे. अशा लोकांना शिधापत्रिकेवर केरोसीन देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेवून मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल, असेही ते म्हणाले.