महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । कडाक्याची थंडी राज्यातील अनेक भागात पडली आहे. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात येत्या 28 डिसेंबरला विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर येत्या 27 डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक स्वरुपाचा पाऊस पडेल. यासंबंधीचे ताजे अपडेट भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहेत.
मागील दिवसांपासून उत्तरेकडील भागांत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे लेह-लडाख यांठिकाणी पारा उणे अंशांवर पोहोचला आहे. त्यासोबतच दिल्ली, राजस्थान, पंजाब, ओडिसा या राज्यांतही थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीमध्ये वाढत्या थंडीपासून दिलासा मिळू शकतो.
भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, भारतातील बहुतांश भागात 5 जानेवारी 2022 पर्यंत थंडीची लाट राहणार नाही. पण आज म्हणजेच, 24 नोव्हेंबर रोजी देशाच्या विविध भागात थंडीची लाट येऊ शकते. हवामान खात्याने आपल्या एका अंदाजात म्हटले आहे की, 27 ते 30 डिसेंबरदरम्यान, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.