महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । देशाच्या शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी सुधारणा घडवून छोट्या शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही वादग्रस्त कृषि कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आता याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना हे तीनही कृषि कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात, असे म्हटले आहे. १९ नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषि कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. यानंतर संसदेतही विधेयक मंजूर करण्यात आले. यासोबतच दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या देणाऱ्या शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतले.
यासंदर्भात एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कायदे रद्द होण्यासाठी काही लोक जबाबदार असल्याचे नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी म्हटले. तसंच हे तीनही कृषि कायदे पुन्हा नव्याने आणले जाऊ शकतात, असे सांगितले. आम्ही कृषि सुधारणा कायदे आणले. पण काही लोकांना हे कायदे आवडले नाहीत. हे कायदे स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोठे बदल घडवणारे होते, असं नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी म्हटले. पण सरकार निराश नाही. आपल्या भारताचा शेतकरी कणा असल्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतले असून, पुढेदेखील टाकू, असे सांगत नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीची गरज सांगितली.