महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । : राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केल़े आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाई
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी पूर्ण लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत थांबणार नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.