महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ जानेवारी । आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. नुकत्यात संपलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2-1 असा विजय मिळवला. पार्लच्या बोलँड पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सलामीचा सामना होणार आहे. काल सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) सलामीला उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी राहुलला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत वेंकटेश अय्यरला हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून तयार केले जाऊ शकते. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे पांड्या संघाबाहेर आहे. शिखर धवनला संधी दिली तर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) प्रतिक्षा लांबू शकते.
केएल राहुल म्हणाला
“मागच्या दोन वर्षात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायाने भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली आहे. आता संघ व्यवस्थापन वेंकटेश अय्यरला संधी देण्यासाठी उत्साहित आहे” असे केएल राहुलने सांगितले. “वेंकटेशने आयपीएलमध्ये केकेआर बरोबर खेळायला सुरुवात केल्यापासून चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. त्याने चांगली कामगिरी केली होती” असे राहुल म्हणाला.
ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स
विजय हजारे वनडे टुर्नामेंटमध्ये पाच सामन्यात ऋतुराज गायकवाडने चार शतक झळकावली आहेत. त्याने 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याशिवाय आयीपएल 2021 मध्ये सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. त्याचवेळी शिखर धवनने पाच सामन्यात फक्त 56 धावा केल्या आहेत. दोघेही सलामीवीर म्हणून खेळतात.
गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावं
“अनुभवी शिखर धवनने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावं, तशा खेळाची त्याच्याकडून अपेक्षा असल्याने राहुलने सांगितलं. शिखर धवन सीनियर आणि अनुभवी खेळाडू आहे. संघाला काय अपेक्षा आहेत, हे त्यांना माहित आहे. तो इथे येऊन क्रिकेटचा आनंद घेतोय. मी स्वत: शिखर धवनला वनडेमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना पाहिलय” असं राहुल म्हणालां.
फिरकी गोलंदाजांना संधी?
पहिल्या दोन वनडेमध्ये आर. अश्विन आणि युजवेंद्र चहल दोघांना स्थान देण्याची राहुलची भूमिका आहे. “आमच्याकडे शानदार स्पिनर आहेत. अश्विनने वनडेमध्ये पुनरागमन केलय. त्याची क्षमता आपल्या सर्वांना ठाऊक आहे. चहल मागच्या काही वर्षांपासून आपली भूमिका चोख बजावतोय. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळू शकते” असे राहुल म्हणाला.