पर्यटकांसाठी Good News! पर्यटनस्थळं सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी ।पर्यटनस्थळ सुरू करण्याबाबत येत्या पाच-सहा दिवसात आढावा घेऊन शासन निर्णय घेईल, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. बदलत्या वातावरणामुळे सर्व जिल्ह्यांत क्लायमेट अॅक्शन प्लॅन तयार करणार, असेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर असून, बुधवारी त्यांनी मराठवाड्यातील विकासकामांचा विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘वातावरणात सतत बदल होत आहे. ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती होती.चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या. अशा काही ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस पडला. एकूण बदलत्या वातावरणामुळे परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यात क्लायमेंट अॅक्शन प्लॅन तयार करणार आहोत. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ उर्जेचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यानुसार सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतले जात आहेत. समृद्धी महामार्गावर २५० मेगावॉट ऊर्जा निर्मितीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा लक्ष्य आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.’

पर्यटन स्थळे केव्हा सुरु होणार, यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ठाकरे यांनी करोनाची आकडेवारी म्हणावी तशी कमी झालेली नाही. काही दिवसात त्याबाबत आढावा घेऊन पर्यटन स्थळे सुरू करण्याबाबत शासन निर्णय घेईल, असे नमूद केले.

वाढत्या अतिक्रमणांमुळे नद्या लोप पावत आहेत; मात्र, औरंगाबाद महापालिकेने खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. अशा उपक्रमाची राज्यभर गरज आहे. त्यामुळे इतर महापालिकांना खाम नदी प्रकल्पाची माहिती दिली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पर्यटनवाढीला चालना मिळावी, यासाठी डबल डेकर इलेक्ट्रिक शहर बसची गरज आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *