महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । भारतात आणि जगभरात गेल्या अडीच वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचे अस्तित्व गेल्या काही दिवसांमध्ये उरलेच नसल्याचा समज निर्माण व्हावा अशी परिस्थिती आसपास दिसू लागली आहे. एकीकडे रशिया-युक्रेनमधलं युद्ध आणि दुसरीकडे भारतात पाच राज्यांमधील निवडणुका, महाराष्ट्रात नवाब मलिक राजीनामा प्रकरण या सगळ्यामुळे कोरोना खरच उरला आहे का? असा प्रश्न पडण्यासारखे चित्र उभे राहिले असतानाच कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य वाढ यासंदर्भात देशातील ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
कोरोनाची तिसरी लाट आणि चौथ्या लाटेची येण्याची शक्यता यासंदर्भात आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक डॉ. टी. जेकब जॉन्स यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे.
भारतात तिसरी लाट संपुष्टात आल्याचे निरीक्षण डॉ. जेकब जॉन्स यांनी मांडले आहे. माझे वैयक्तिक मत आहे की तिसरी लाट आता संपली आहे. दररोज नोंद होणारी बाधितांची कमी आणि स्थिर संख्या याचे प्रमाण असल्याचे माझे मत आहे. हेच चित्र किमान चार आठवडे दिसल्यामुळे मी हा निष्कर्ष काढला आहे. भारतातील सगळ्याच राज्यांमध्ये हे चित्र दिसत असल्याचे जॉन्स म्हणाले.
चौथ्या लाटेसंदर्भात देखील डॉ. जेकब जॉन्स यांनी भूमिका मांडली आहे. भारतात चौथ्या लाटेची शक्यता फारच कमी असल्याचे जेकब म्हणाले आहेत. अल्फा, बीटा, गामा किंवा ओमिक्रॉन यापेक्षा एकदम वेगळाच व्हेरिएंट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत देशात चौथ्या लाटेची भीती नाही. कोरोनाचा विषाणू सातत्याने स्वत:मध्ये बदल करत नवनवे व्हेरिएंट तयार करत आहे. पण यातील काहीच व्हेरिएंट काही प्रमाणात बाधितांची संख्या वाढवू शकतात, असे मत डॉ. जेकब जोन्स यांनी नमूद केले आहे. दरम्यान, डॉ. जेकब जोन्स यांनी देशात सातत्याने तपासणी आणि जेनोम सिक्वेन्सिंग करत राहण्याची गरज यावेळी व्यक्त केली. जेणेकरून कोरोनाचा कोणताही विषाणू दुर्लक्षित होणार नाही.